सुतक
सुतक म्हणजे काय?
सुतक का पाळावे? त्यामागिल वैज्ञानिक कारण काय?
"अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता!
प्राणापान समायुक्त्वा पचाम्यन्नं चतुर्विधम्!!"
असा हा अग्नि शरिरातून निघून गेल्यानंतर देह निस्तेज होतो.जिथे तेज (अग्नि) नाही तिथे अर्थातच विषारी कृमी,जंतू झपाट्याने वाढत असतात आरोग्य दृष्टीने ह्या जंतूंचा इतरांना संसर्ग होऊन रोग बाधा होऊ नये म्हणून मृतशरिर अग्नित दहन केले जाते.
हा अंतिम विधी करण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे तिथे फैलावलेले कृमी जंतू (की जे इतके सूक्ष्म असतात) नष्ट होण्यास १० दिवसांचा कालावधी लागतो.
हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेले शास्त्र अशिक्षित व्यक्तिंना समजू शकत नाही म्हणून पूर्वज ज्ञानी ऋषिमुनींनी याला श्रद्धा प्रेमाच्या चौकटीत आरोग्य टिकविण्यासाठी बंदिस्त केले.
म्हणून तर पुढील दहा दिवसांनंतर जे विधी (संस्कार) प्रेम श्रद्धा पूर्वक केले जातात त्याला "श्राद्ध" असे म्हणतात.
"श्रद्धायां क्रियते इति श्राद्धः"
अशा प्रकारे हे सुतकाविषयी झाले.
आता प्रश्न धार्मिक विधी संबंधी........
कुठलाही धार्मिक विधी, पूजा, पारायण वगैरे हे "मनापासून" केले तरच त्यातून ऊर्जा मिळते आणि नकळत आनंद,प्रसन्नता प्राप्त होते.म्हणूनच सर्व संतांनी अध्यात्मात प्रगती करायची असेल तर मन दृढ ठेवून सत्य श्रद्धा आणि भक्ती युक्त ठेवावे असा जागोजागी उपदेश केला आहे.
वेळेअभावी इथे फक्त जगत् गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा उपदेश देत आहे...
"मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धींचे कारण!!"
सुतक हे आरोग्याच्या दृष्टीने शरिराला असते मनाला नाही.पण मृत्युचा प्रसंग घडला असल्याने तेथील वातावरण हे मन प्रसन्न होण्याइतके शुद्ध नसते मृत व्यक्तीच्या आठवणी आणि भेटायला आलेली माणसे यांच्यामुळे कितिही नाही म्हटले तरी उपासना, पूजा करणाऱ्याचे मन एकाग्र होऊ शकत नाही म्हणून दहा पंधरा दिवस धार्मिक विधी करू नये असे जाणकारांनी सांगितले आहे.
या मनाच्या लहरींचा ज्याने सखोल अभ्यास केला आहे अशीच माणसे याकाळात कितीही गंभीर वातावरण असले तरी नामस्मरण सोडत नाही कारण नामस्मरण या शब्दाचा अर्थच असा आहे की,"नामाचे स्मरण"
स्मरण याचा अर्थ नामाला मनात घट्ट धरून ठेवणे. अशी किमया फक्त संत किंवा एकनिष्ठ विरक्त भक्तच करतात.
त्यांना भगवत् गीतेत "स्थितप्रज्ञ" असे म्हणतात असा स्थितप्रज्ञ देहाच्या आणि मनाच्या सर्व विकारांवर विजय मिळवतो जगत् गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज सांगतात..
"फिटले सुतक जन्म मरणाचे!
माझा मी संकोचे दूरी झालो!!"
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे कोणत्याही परिस्थितीत शरिराने पूजा जप नामस्मरण करता आले नाही तर साधकाने आपल्या मनात पूजा,जप
नामस्मरण दृढ विश्वासाने केले तरी ते ईश्वराला प्राप्त होते.यालाच "मानस पूजा"असेही म्हणतात. तेव्हा साधकाने समोर कोणताही प्रसंग असला तरी श्रद्धा,भक्तीआणि प्रेम पूर्वक मानस पूजा नामस्मरण अवश्य करावे.कारण पुढील क्षणात काय घडेल हे संतांशिवाय कुणीही सांगू शकत नाही.
*"सुखाची घडी लोटता दुःख आहे!
पुढे सर्व जाईल काही न राहे!!"*
|| सर्वम सर्वेश्वरी नमो नम: ||
टिप्पण्या